राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठक   

मुंबई, (प्रतिनिधी) : सशस्त्र हल्ले रोखण्याचा निर्णय झाला असला तरी पाकिस्तानच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर नेहमीच पाकिस्तानच्या लक्ष्यावर राहिले आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक  झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री, लष्कराच्या तिन्ही दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करेल, असे फडणवीस यांनी बैठकीनंतर सांगितले.
 
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, भारतीय लष्करातर्फे लेफ्ट. जनरल पवन चढ्ढा, कर्नल संदीप सील, भारतीय नौदलातर्फे रियर अ‍ॅडमिरल अनिल जग्गी, नौदल कमांडर नितेश गर्ग, भारतीय हवाई दलातर्फे एअर वाईस मार्शल रजत मोहन बैठकीला उपस्थित होते. रिझर्व बँक, जेएनपीटी, बीपीटी, मुंबई स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, एटीएस, होमगार्ड यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.गुप्तचर माहितीचे आदानप्रदान, तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि काय खबरदारी घ्यायची, याबरोबरच संरक्षण दलांना राज्य सरकारतर्फे अपेक्षित सहकार्य आणि अधिक गतीची समन्वय यंत्रणा उभारण्यावर या बैठकीत चर्चा झाली. 
 
यावेळी  देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय लष्कराने  ज्या ताकदीने आणि अचूकपणे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले, ते अभूतपूर्व आहे. संरक्षण दलाला मी सॅल्युट करतो. मुंबई महत्वपूर्ण शहर आहे. मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. यापूर्वी मुंबईवर हल्ले झाले तेव्हा शत्रूकडून आम्ही भारताच्या आर्थिक राजधानीवर हल्ला केला हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. येणार्‍या काळात संपूर्ण ताकदीने काम करावे लागेल. या स्थितीत गुप्तचर माहितीचे आदान-प्रदान हे महत्त्वपूर्ण आहे. सायबर सुरक्षेबाबत सर्वांनाच अधिक काळजी घ्यावी लागेल. राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण दलाचे अधिकारी मिळून अधिक समन्वयाने एकत्रितपणे काम करतील. नागरी सुरक्षेच्या संदर्भात काल एक बैठक घेण्यात आली. सध्याच्या युद्धजन्य स्थितीत महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांची आपण बैठक घेतली होती. पण, सैन्यदलाच्या अधिकार्‍यांशी आपण बैठक घेतली नव्हती. कालच्या बैठकीत या दिवसांमध्ये आपण अधिक काय करायची गरज आहे, भविष्यात आपण काय केले पाहिजे आणि आत्ताही आपण कसे सावध राहायला हवे, यादृष्टीने सैन्यदलाच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत, हे समजून घेतले, असे फडणवीस म्हणाले. आपण जिंकू शकत नाही, हे पाकिस्तानला माहिती आहे. त्यामुळे ते प्रॉक्सी वॉर सुरू करतात. त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करतात.मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे संवेदनशील आहे. त्या दृष्टीने काय खबरदारी घ्यायला हवी, यासाठी आजची बैठक घेतल्याचे त्यांनी सांगितले.

नोडल अधिकारी नेमणार 

राज्य सरकार आणि संरक्षण दल यांनी एकत्र येऊन सहकार्याने काम करावे, याकरता नोडल अधिकारी नियुक्त करण्यासंदर्भात चर्चा झाली. मुंबईला सातत्याने लक्ष्य केले जाते, त्यामुळे जे लक्ष्य करतात त्यांचे कार्य काय, त्यावर लक्ष ठेवणे, तपासणी करणे यावर चर्चा झाली असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच, तिन्ही दलांचे अभिनंदन केले.  
 
या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव अश्विनी भीडे, सचिव श्रीकर परदेशी, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, नागरी सुरक्षाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रभातकुमार, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक शिरीष जैन, राज्यातील आपत्ती व्यवस्थापनच्या अतिरिक्त मुख्य सचिव सोनिया सेठी, तसेच मुंबई जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 

Related Articles